सुरू झाला जंबो कोळंबीच्या बीजारोपणाचा हंगाम
डॉ. विजय पां. जोशी
जंबो कोळंबीचे बीज तलावात सोडण्याचा हंगाम आता सुरू झाला आहे. दर्जेदार मत्स्यबीज तलावात योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने सोडणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे कोळंबी बीजासंबंधीची शास्त्रीय माहिती उत्पादकाला असणे गरजेचे आहे.
साधारणतः ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे महिने तलावात जंबो कोळंबी बीज सोडण्याचे आहेत. शेतकऱ्याला शेतात वेळेवर चांगल्या दर्जाचे बीज पेरणे जसे आवश्यक व महत्त्वाचे आहे, तसेच मत्स्यशेतकऱ्याला त्याच्या तलावात योग्य बीज वेळेवर सोडणे गरजेचे आहे. यशस्वी जंबो कोळंबी शेतीकरिता कोळंबी बीज ही प्राथमिक गरज आहे. ते बीज चांगल्या दर्जाचे व निर्भेळ असायला हवे. म्हणून कोळंबी बीजाबाबत पुढील गोष्टी महत्त्वाच्या आहेत ः
बीजाची शुद्धता महत्त्वाची
साधारणपणे कोळंबी शेतकरी गुजरात व महाराष्ट्रातील नद्यांमधून पकडले जाणारे बीज विकत घेतात, पण असे बीज शुद्ध नसते. आता प्रश्न असा पडतो, की कोळंबीत शुद्ध बीज असा प्रकार असतो का? तर नक्कीच असतो. आता हे कळण्याकरिता थोडी शास्त्रीय माहिती देणे गरजेचे आहे.
गोड्या पाण्यातील कोळंबी मॅक्रोब्रॅचिअम (चरलीेलीरलहर्ळीा) प्रजातीच्या अनेक उपजाती आहेत आणि या सर्व उपजातींचे बीज सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान नद्यांमध्ये आढळते व पकडले जाते. आता आपल्या राज्यात मॅक्रोब्रॅचिअम इडेला, मॅक्रोब्रॅचिअम इक्विडन्स, मॅक्रोब्रॅचिअम रूड व मॅक्रोब्रॅचिअम रोझेनबर्गी या वेगवेगळ्या उपजातींचे बीज मिळते. यापैकी केवळ रोझेनबर्गी ही मोठी वाढणारी व म्हणून कोळंबी शेतीला परवडणारी उपजात आहे. इतर सर्व उपजातींची कोळंबी केवळ पाच ते दहा ग्रॅम एवढीच वाढते. आता होते काय की, कोळंबी शेतकरी जेव्हा नदीत पकडलेले कोळंबी बीज आणतो, तेव्हा त्यात निसर्गतः या सर्व उपजातींच्या बीजाची मिसळ असते, पण दिसताना सर्व कोळंबी बीज सारखेच दिसते. म्हणजेच कोळंबी शेतकरी जेव्हा जंबो कोळंबीचे बीज आणतो, तेव्हा त्यात इतर प्रत्येक लहानच राहणाऱ्या कोळंबीचे बीज असते. परिणामी उत्पादन कमी मिळते.
एका शेतकऱ्याचे उदाहरण देता येईल- या शेतकऱ्याने आपल्या तलावात नदीतून पकडलेले जंबो कोळंबीचे पन्नास हजार बीज सोडले, पण वर्षाच्या शेवटी त्यांना जंबो कोळंबीचे पाच हजार नग मिळाले. एकूण ३०० किलो कोळंबी मिळाली. मिळालेल्या इतर छोट्या कोळंबींचे वजन प्रत्येकी तीन ते दहा ग्रॅमच्या दरम्यान होते. म्हणजेच पन्नास हजार बीजापैकी त्यांना जंबो कोळंबीचे केवळ पाच हजार नग मिळाले. इतर सर्व कोळंबी बीज मॅक्रोब्रॅचिअमच्या इतर उपजातींचे होते. अशा प्रकारचे अनुभव अनेक कोळंबी शेतकऱ्यांना आलेला आहे व येत आहे. या प्रकारात शेतकऱ्याला उत्पादन तर कमी मिळतेच, त्याबरोबर त्याचा खाद्यावरील खर्चही वाढतो, कारण बरेचसे खाद्य ही बारीक कोळंबी फस्त करते. थोडक्यात, शेतात जसे तण माजते, तसेच कोळंबी तलावात ही लहान आकाराची कोळंबी असते व ती आपल्या मुख्य उत्पादनावर अनिष्ट परिणाम करते.
आणखी एक बाब अशी, की अशा प्रकारचे बीज वाटी, माप, पसा या हिशेबाने विकले जाते, त्यामुळे किती बीज आपण घेतले व तलावात सोडले हे शेतकऱ्याला कळतच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनाचे अंदाज चुकतात.
बीजाची आवश्यकता -
केवळ जंबो कोळंबीची शेती करायची असेल, तर हेक्टरी पन्नास हजार किंवा एकरी वीस हजार या प्रमाणात कोळंबी बीज साठवावे. रोहू, कटला या माशांबरोबर करायची असेल तर हेक्टरी तीस हजार किंवा एकरी बारा हजार या प्रमाणात बीज सोडावे. तलावाच्या उत्पादकतेप्रमाणे बीज साठविण्याचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते, पण आवश्यकतेपेक्षा जास्त बीज तलावात कधीही सोडू नये.
बीज दर्जेदार हवे -
बीजोत्पादन केंद्रातील बीज शेतकऱ्याने पारखून मगच खरेदी करावे. निरोगी बीज चपळ असते, याउलट रोगट बीज सुस्त असते, ते एकाच ठिकाणी शांत बसून असते, कधी कधी त्याच्या अंगावर डागही असतात.
बीजारोपणाची पद्धत -
पॅकबंद केलेले बीज लवकरात लवकर शेतकऱ्याने आपल्या तलावापर्यंत न्यावे. या करिता शक्य असेल तर स्वतंत्र वाहन वापरावे. प्रवास शक्यतोवर रात्री किंवा थंड वेळी करावा, म्हणजे बीज जगणुकीचे प्रमाण चांगले मिळते. तलावावर पोचल्यानंतर पिशव्यांमधील बीज एकदम तलावात सोडू नये तर त्यांचे अनुकूलन करून मगच तलावात सोडावे.
अनुकूलनाची पहिली पायरी म्हणजे बीज असलेल्या पिशव्या तलावात काठाशी साधारणतः १५ मिनिटे ते ३० मिनिटे तरंगत ठेवाव्यात. त्यानंतर पिशव्या उघडून तलावातील थोडे थोडे पाणी पिशव्यांमध्ये टाकावे. याकरिता भांडे किंवा पेल्याचा वापर करावा; असे केल्यामुळे तलावातील पाण्याची कोळंबी बीजाला सवय होते व नंतर बीज तलावात सोडावे. बीजाचे अनुकूलन करणे अत्यावश्यक आहे. याचे कारण म्हणजे तलाव व पिशवीतील पाण्याचे तापमान व सामू यात बराच फरक असतो. अशा वेळी अनुकूलन न करता बीज तलावात टाकले तर बीजावर ताण येऊन बीजाची मरतुक होऊ शकते. निर्भेळ, दर्जेदार व आरोग्यवान बीज व्यवस्थितपणे अनुकुलन करून तलावात सोडले तर मत्स्यशेतकऱ्याने अर्धी लढाई जिंकली असे म्हणायला हरकत नाही.
जंबो कोळंबीचे शुद्ध बीज हवेय?
जंबो कोळंबीच्या शुद्ध बीजाच्या उपलब्धतेसाठी रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात जंबो कोळंबी बीजोत्पादन केंद्र कार्यान्वित झाले असून, ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत तेथे बीज उपलब्ध असते. हे केंद्र दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत आहे.
(०२३५२) २३२९९५
(लेखक रत्नागिरीच्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी आहेत.)
No comments:
Post a Comment