छोट्या क्षेत्रातही केले यशस्वी कोळंबी उत्पादन
राज्यातील बरेच मत्स्य उत्पादक जंबो कोळंबीचे उत्पादन घेण्याचे प्रयत्न करत आहेत. जंबो कोळंबीच्या शेतीकरिता मोठा म्हणजेच किमान अर्धा एकराचा तलाव लागतो, असा अनेकांचा गैरसमज आहे; मात्र मुरादपूर (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील वासुदेव रामचंद्र नार्वेकर हे केवळ 60 चौरस मीटर क्षेत्रातून गेली तीन वर्षे जंबो कोळंबीचे चांगले उत्पादन घेत आहेत.
डॉ. विजय जोशी
गोड्या पाण्यातील जंबो कोळंबी (मॅक्रोब्रॅचिअम रोझेनबर्गी) इतर सर्व जातींच्या कोळंबीच्या तुलनेत जलद वाढते. या कोळंबीला देश-परदेशात मागणी असून त्याला दरही चांगला मिळतो. ही रोगालाही सहजासहजी बळी पडत नाही. अशा अनेक कारणांमुळे जंबो कोळंबी ही संवर्धनाकरिता सर्वांत लोकप्रिय जात आहे. महाराष्ट्रातही बरेच मत्स्योत्पादक तसेच नव-नवीन उद्योजक जंबो कोळंबीच्या शेतीचे प्रयत्न करत आहेत. मोठे म्हणजे किमान अर्ध्या एकराचे क्षेत्र असेल तरच कोळंबी उत्पादन घेता येत असल्याचा अनेकांचा समज असतो; मात्र छोट्या तलावातून कोळंबीचे यशस्वी उत्पादन घेऊन मुरादपूर (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील वासुदेव रामचंद्र नार्वेकर यांनी हा समज खोटा ठरविला आहे.
श्री. नार्वेकर यांचा मूळ व्यवसाय सोनारकीचा. ते चांगले आंबा बागायतदारही असून त्यासोबत नारळ, लिंबू आदी फळांची लागवडही त्यांनी केली आहे. त्याला जोड म्हणून गेल्या तीन वर्षांपासून ते आपल्या शेतातील तळ्यात जंबो कोळंबी संवर्धन करत आहेत. तळ्याची लांबी, रुंदी आणि खोली अनुक्रमे दहा मीटर, सहा मीटर आणि दोन मीटर आहे.
सुरवातीला त्यांनी मुंबईतून सायप्रिनससारखे मासे आणून तळ्यात पाळले होते. त्यानंतर जंबो कोळंबीची माहिती मिळाल्यावर त्याचे पालन तीन वर्षांपूर्वी सुरू केले. रत्नगिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातून जंबो कोळंबी उत्पादनाविषयीचे तांत्रिक मार्गदर्शन त्यांनी घेतले.
तळ्याचे व्यवस्थापन
श्री. नार्वेकर यांनी तळ्याच्या तळाशी मातीचा 30 सें.मी. जाडीचा थर टाकला आहे. प्रति वर्षी संपूर्ण तळे रिकामे करून तळ उन्हात तापवला जातो. त्यानंतर तळ्यात दोन घमेली शेणखत, दोन किलो युरिया आणि तीन किलो चुना टाकला जातो. त्यानंतर ते पाण्याने भरण्यात येते. त्यात प्लवंगांच्या वाढीकरिता 10-12 दिवसांचा अवधी दिला जातो. जंबो कोळंबीचे एक हजार शुद्ध बीज सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातून आणले जाते. बीजाचा प्रवासाचा कालावधी केवळ दीड तास असल्याने बीजाची जगणूक 100 टक्के मिळते. या बीजाचे अनुकूलन करून ते तळ्यात सर्वत्र विखुरले जाते. हे बीज ऑगस्ट महिन्यात सोडले जाते. तीन महिन्यांनी पुन्हा एकदा शेणखत व प्रत्येकी एक किलो युरिया आणि चुना तळ्यात दिला जातो. तळ्यात श्री. नार्वेकर यांनी कमळाची रोपे लावली असल्याने तळे सुशोभित तर झाले आहेच, शिवाय कोळंबीला लपण्यास चांगला आसरा निर्माण झाला आहे. मे महिन्यात संपूर्ण कोळंबी, पाणी काढून तळे रिकामे केले जाते.
खाद्य व्यवस्थापन
कोळंबीला खाद्य देण्यासाठी श्री. नार्वेकर यांनी तळ्यात तीन ठिकाणी "फीड ट्रे टांगून ठेवले आहेत. त्यामध्ये सकाळी सहा वाजता व संध्याकाळी सहा वाजता खाद्य ठेवण्यात येते. कोंडा, भुसा, भाकरी, भात, भुशी, जवळ्याची भुकटी, कांडी खाद्य आणि कोंबडीचे आतडे अशा प्रकारचे खाद्य कोळंबीला दिले जाते. हे सर्व सहज उपलब्ध आणि स्वस्त आहे. "फीड ट्रे'मध्ये उरलेले खाद्य दुसऱ्या दिवशी काढून ट्रे स्वच्छ करून नवे खाद्य भरून तळ्यात टांगले जातात.
पाण्याचे व्यवस्थापन
कोळंबीची वाढ भरपूर होत असल्यामुळे दर पंधरा दिवसांनी तळ्यातील पाणी बदलले जाते. तळ्यातील 30 टक्के पाणी काढून तेवढेच पाणी नव्याने भरले जाते. काढलेले पाणी आंबा बागेला दिले जाते. असे केल्यामुळे तळ्यातील पाण्याचा दर्जा चांगला राहतो. दहा महिन्याच्या (ऑगस्ट ते मे) संवर्धन कालावधीत कोळंबी जगणुकीचे प्रमाण सुमारे 50 ते 70 टक्के एवढे मिळते. प्रत्येक कोळंबीची लांबी सरासरी पाच इंच तर वजन सुमारे 50 ते 60 ग्रॅम (सरासरी 56 ग्रॅम) एवढे मिळत असल्याचा श्री. नार्वेकर यांचा अनुभव आहे. सहा महिन्यांचा संवर्धन कालावधी गेल्यानंतरच मोठ्या कोळंबीची काढणी केली जाते. गेली तीन वर्षे त्यांना प्रति वर्षी सुमारे चाळीस किलोपर्यंत कोळंबी उत्पादन मिळते आहे. या कोळंबीची चव सागरी कोळंबीपेक्षाही चांगली असल्याचे ते सांगतात.
अर्थशास्त्र
श्री. नार्वेकर यांना आतापर्यंत छोट्या क्षेत्रातही चांगले उत्पादन मिळत आहे; मात्र त्यांनी त्याची विक्री केलेली नाही. घरात खाण्यासाठी, तसेच शेजारीपाजारी, नातेवाईक आदींना देण्यासाठी त्यांनी त्याचा वापर केला आहे; मात्र बाजारभावानुसार त्यांच्या उत्पादनाचे आर्थिक गणित मांडता येऊ शकेल. त्यांना मिळणारे उत्पादन सुमारे चाळीस किलो आहे. स्थानिक बाजारात विक्री केल्यास जंबो कोळंबीची किंमत प्रति किलो सव्वाशे ते दीडशे रुपये आहे. किमान सव्वाशे रुपये हिशेबाने चाळीस किलो कोळंबीपासून पाच हजार रुपये उत्पन्न मिळते. श्री. नार्वेकर वापरत असलेले कोळंबी खाद्य सहज उपलब्ध असलेले आणि स्वस्त आहे. तसेच व्यवस्थापनासाठीची सर्व कामे ते स्वतः करतात, त्यामुळे मजुरीचाही खर्च वाचतो. कोळंबी व्यवस्थापनासाठी त्यांना येणारा एकंदर खर्च सुमारे एक हजार रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळे केवळ साठ चौरस मीटर क्षेत्रातून चार हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना कोळंबी उत्पादनातून मिळते, असे म्हणायला हरकत नाही. गेल्या तीन वर्षांचा अनुभव चांगला असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला असून यंदापासून ते व्यावसायिक उत्पादन घेणार आहेत. त्यासाठी त्यांनी ऑगस्ट महिन्यात दोन हजार बीज तळ्यात सोडले असून दोन महिन्यांत कोळंबीची लांबी दीड इंचांपर्यंत पोचली आहे. तसेच यंदा तळ्यात अन्य कोणत्याही प्रकारचे मासे नसून केवळ कोळंबीच सोडली आहे. त्यामुळे वाढीचे प्रमाण चांगले आहे. जंबो कोळंबीच्या निर्यातीलाही चांगली किंमत मिळते. 100 ग्रॅम पेक्षा कमी वजनाच्या कोळंबीला 150 ते दोनशे रुपये किलो तर 100 ग्रॅम पेक्षा जास्त वजनाच्या कोळंबीला तीनशे ते चारशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतो. जंबो कोळंबी संवर्धनाकरिता प्रत्येक वेळी खूप मोठे क्षेत्रच आवश्यक आहे असे नाही, तर काळजीपूर्वक व्यवस्थापन केल्यास
लहान
क्षेत्रातही कोळंबी संवर्धन करणे शक्य आहे हे श्री. नार्वेकर यांच्या उदाहरणातून सिद्ध होते. कोकणात बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. तसेच घाटावर अनेक ठिकाणी शेतामध्ये छोटी छोटी पाणथळ क्षेत्रे असतात. काही ठिकाणी कोणतीही पिके घेणे शक्य नसते; मात्र यापैकी कोणत्याही ठिकाणी क्षेत्र लहान असले तरीही जंबो कोळंबी संवर्धन यशस्वीपणे करणे शक्य आहे, हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे.
- श्री. नार्वेकर 9423293062
- डॉ. जोशी 9423291434
(लेखक रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)
No comments:
Post a Comment